कुसगाव : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंहगड लोणावळा कॅम्पसच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व प्राचार्यांनी उत्स्फूर्तपणे कॅन्डल मार्च काढला.
यामध्ये संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड व वस्तीग्रह प्रमुख, श्रीमती काशीबाई नवले शिक्षण सहस्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई सहभागी झाले होते. गणेश मंदिरापासून निघालेल्या या फेरीमध्ये ‘सिंहगड’च्या सात महाविद्यालयांमधील सुमारे ३००हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यात कॅम्पसमधील काश्मिरी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘हम सब एक है’ अशा घोषणा देत कॅम्पस दणाणून सोडला होता. गणेश मंदिर ते ॲम्फी थिएटरपर्यंत या फेरीचे नियोजन करण्यात आले होते. ॲम्फी थिएटर स्टेजवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.